आजचे लोक अनेक बँक खाती वापरतात. कालांतराने लोकांनी काही बँक खाती वापरणे बंद केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती आपले बँक खाते दीर्घकाळ वापरत नसेल, तर ते किती दिवसांत बंद होणार?
व्यवहार न केल्यास बँक खाते किती दिवसांत बंद होते?
तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास आणि काही कारणास्तव तुम्ही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवहार करत नसाल, तर तुमचे खाते बँकेद्वारे निष्क्रिय केले जाते. खाते निष्क्रिय केल्यानंतर, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही. निष्क्रिय खात्यात कोणतीही रक्कम जमा केली तर ती तशीच राहील आणि कालांतराने बँक त्यावर नियमित व्याज देत राहील.
निष्क्रिय खाते नियमित कसे करावे?
कोणतेही निष्क्रिय खाते सहजपणे नियमित खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन KY करून घ्यावे लागेल आणि त्यासाठी पॅन, आधार यासारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील. तुमचे संयुक्त खाते असल्यास दोन्ही खातेधारकांना केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील.
शुल्क किती आहे?
निष्क्रिय खाते नियमित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, तुम्ही निष्क्रिय खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तरीही बँकेकडून तुमच्यावर कोणताही दंड आकारला जाऊ शकत नाही.